सातारा : जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे 11 हजार 627 ई-वाहने रस्त्यावर धावताना दिसत आहेत. त्यामध्ये दुचाकीबरोबर चारचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. इंधन दरवाढ, पर्यावरण संवर्धनाबाबतची नागरिकांमध्ये असलेल्या जागरूकतेमुळे ई-वाहनाकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे.
इंधनाचे दर आकाशाला भिडल्याने अनेकांनी नवीन वाहनांकडे पाठ फिरवली आहे. असे असले तरी जास्त अंतर कापणाऱ्या ई-वाहनाला मात्र वाहनधारकांकडून पसंती मिळत आहे. मात्र, चार्जिंग सुविधा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ई-कार, ई-ऑटोरिक्षा, ई-टॅक्सी, ई-बाईक खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा आहे. सार्वजनिक वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या रिक्षामध्ये ई-रिक्षाची वाढ होणे हे चांगले संकेत असल्याचे बोलले जात आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात ई-वाहनांची संख्या वाढणे ही जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी सकारात्मक बाब आहे.
ई-वाहनांसाठी देखील खर्च अत्यल्प येत आहे. त्यामुळे दीर्घकालीन बचत होण्यास मदत होत आहे. प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रवास, दुचाकी एकदा चार्जिंग केल्यानंतर सुमारे 100 ते 150 कि.मी. अंतर कापत आहे.
जिल्ह्यातील वाहनांची स्थिती...
जिल्ह्यात जीप व इतर 9 हजार 96, स्कूल बस 32, दुचाकी 32 हजार 362, रिक्षा 296, चारचाकी 5 हजार 171, रुग्णवाहिका 12, ट्रक आणि ट्रॅक्टर 3 हजार 120 अशी वाहनांची स्थिती आहे. सन 2023-24 मध्ये 3 हजार 498 , सन 2024- 25 मध्ये 4 हजार 132, सन 2025-26 मध्ये 3 हजार 997 ई-वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयाकडे असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी दिली.