सातारा : गगनाला दर भिडलेल्या साखरेचा जिल्ह्यात काळा बाजार सुरू झाल्याचे उघडकीस आलेे. दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांना दिली जाणारी ३०० किलो साखर खासगी किराणा दुकानात सापडली. जिल्हा पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर संबंधित किराणा दुकानदारासह रेशन दुकानदारांवर गुन्हा दाखल केला.
नफेखोरीसाठी व्यापार्यांनीही साठेबाजी सुरू केली आहे. त्यातच रेशनिंगची साखर खुल्या बाजारात येऊ लागल्याचा प्रकार सातार्यात मंगळवारी उघडकीस आला. कर्मवीर कॉलनीतील स्वामी समर्थ किराणा दुकानात रेशन दुकानातून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना (अंत्योदय योजना) दिल्या जाणार्या साखरेची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारी वाढल्या. त्यानंतर पुरवठा विभागाने संबंधित दुकानावर छापा टाकला. यात ३०० किलो साखर जप्त केली.
ही साखर किराणा दुकानदाराकडे आली कुठून? कोणत्या रेशन दुकानातून कोणत्या दुकानदाराने साखर दिली, याची माहिती पुरवठा विभाग घेत आहे. असे प्रकार अन्यत्र होत आहेत का, याचीही चौकशी सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने म्हणाल्या, जिल्ह्यात अंत्योदय योजनेतून गरीब कुटुंबांना रेशन कार्डवर साखर दिली जाते. स्वामी समर्थ किराणा दुकानातून 'महाराष्ट्र शासन' असे लिहिलेली साखरेची चार पोती जप्त केली.