सातारा : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई वेधशाळेने सातारा व घाट क्षेत्राला पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळतील अशी आस शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
सप्टेंबर महिन्याचा पंधरवडा उलटला तरी पावसाने सातारा जिल्ह्यात सर्वत्र उघडीप दिली आहे. मात्र दिवसेंदिवस तापमानात वाढ होवू लागली असून उकाडाही जाणवू लागला आहे. कडक ऊन, अधून मधून ढगाळ वातावरण जाणवत आहे. पावसाने पाठ फिरवली असल्याने खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. पाऊस न पडल्यास खरीप हंगामातील पिके वाया जातील मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे.
मुुंबई वेधशाळेच्या हवामान विभागाने दि. १९, २०, २१ व २२ सप्टेंबर रोजी सातारा जिल्हा व जिल्ह्यातील घाट क्षेत्रास यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाच्या पुन्हा सरी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.