मेढा : जावळी तालुक्यातील दुंद घाटात अतिवृष्टीमुळे रस्त्यावर मोठमोठे दगड व मलबा कोसळल्याने दुंदमार्गे एकीवकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय झाली होती. या धोकादायक परिस्थितीबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत दगड व मलबा हटवण्यात आला.
मुसळधार पावसाने दुंद घाटात अतिवृष्टीमुळे रस्त्यावर मोठमोठे दगड व मलबा कोसळला होता. दै. ‘पुढारी’ने हे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता बांधकाम विभाग यंत्रसामग्रीसह घटनास्थळी पोहचला. घाटातील ज्या-ज्या ठिकाणी मोठे दगड व मलबा पडला होता, ते हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर घाटरस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला असून, दुंदमार्गे एकीवकडे जाणारी वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, घाट परिसरात अजूनही दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.