सातारा : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. मात्र विजेच्या प्रचंड दाबामुळे विद्युत ट्रॉन्सफार्मर जळण्याचे प्रकार घडत आहेत. नवीन डीपी बसवण्यासाठी बराच कालावधी जात आहे. महावितरणच्या या घोळात शेतकऱ्यांचे पिके जळून जात असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भूजल पातळीतही कमालीची घट जाणवू लागली आहे. विहीरी, ओढे, नाले, तलावामधील उपलब्ध पाण्यावर शेतकरी आपली पिके जगवताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे शेतीपंपाना विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विद्युत ट्रॉन्सफार्मरवर प्रचंड लोड येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी डीपी जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तर काही ठिकाणी प्रचंड दाबामुळे डीपी जळून खाक होत आहेत.
मात्र हे डीपी बदलण्यासाठी महावितरणची यंत्रणा बराच दिवसाचा कालावधी लावत आहेत. अनेकदा शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या पायऱ्या चढून याबाबतची हकीकत सांगण्यात आली तरीही हे अधिकारी व कर्मचारी कानाडोळा करत असतात. त्यामुळे प्रंचड उन्हामुळे पाणी असूनही पिकांना विजेअभावी पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके करपू लागली आहेत तर काही ठिकाणी वाळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महावितरण ऐन उन्हाळ्यात तरी डीपींची कामे त्वरित करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.