सातारा : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असल्याने जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमधून कोणाला संधी मिळणार? याविषयी उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची टर्म संपल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार का? याविषयी चर्चा सुरू आहे. त्याचवेळी भाजपमधून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे की, भाजपचे निवडणूक प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विधानपरिषदेसाठी जोरदार फिल्डिंग लागल्याचेही चित्र दिसत आहे.
विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातून विधानपरिषदेवर गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचीही टर्म संपली आहे. शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जातात. पक्ष अडचणीत असताना व शिंदे यांना भाजप आणि अन्य पक्षांकडून मोठमोठ्या ऑफर असताना त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही.
त्यामुळे शरद पवारही शिंदेंनाच विधानपरिषदेवर उमेदवार म्हणून पुन्हा संधी देतील, असे बोलले जात आहे. मात्र, महाविकास आघाडी एकच उमेदवार देऊ शकते. काँग्रेस व शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवले. त्यामुळे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसलाच पुन्हा विधानपरिषदेवर संधी मिळेल, असे नाही. शिवसेना अथवा काँग्रेसने या जागेवर दावा केला, तर शिंदे यांना थांबावे लागेल.