सातारा : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी 30 लाख घरे मंजूर केली होती. त्यातील 5 लाख घरे पूर्ण झाली असून याचा लोकार्पण व या योजनेसाठी 10 हजार कोटी निधी वितरणाचा कार्यक्रम सातारा येथे शुक्रवार, दि. 15 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. दरम्यान, हा कार्यक्रम प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित करुन यशस्वी करावा, असे आवाहनही ना. गोरे यांनी केले.
सातारा येथे 15 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आला. यावेळी आ. मनोज घोरपडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेचा कार्यक्रम सातारा येथे होत आहे, याचा अभिमान आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहावे यासाठी एसटी बसेसचे नियोजन करावे. त्यांच्यासाठी फुड पॅकेटची व्यवस्था करावी. उन्हाची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी जागोजागी पंखे व कुलरची व्यवस्था करावी. वेळ खूप कमी आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी सामूहिक जबाबदारी घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना ना. जयकुमार गोरे यांनी दिल्या. दरम्यान, हा कार्यक्रम सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलेे.