सातारा : पाटखळ जिल्हा परिषद गट व गणासाठी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर शनिवारी मतदान प्रक्रिया सुरु होती. दुपारी कार्यकर्त्यांना बोगस मतदान होत असल्याचा संशय आला. यावरून भाजप व शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाला. सुरूवातीला बाचाबाची झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगड-विटा भिरकावल्या. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण झाले. अखेर पोलिस फौजफाटा दाखल झाल्यानंतर जमाव पांगला.
सातारा तालुक्यातील पाटखळ गणात तणावपूर्ण वातावरणातच सकाळपासून मतदान सुरू होते. दुपारी 4.30 च्या दरम्यान पाटखळ येथे बोगस मतदानावरून दोन्ही गटांत सुरूवातीला बाचाबाची होवून जोरदार हाणामारी झाली. दगड-विटा उचलून एकमेकांवर भिरकावण्यात आल्या. मतदानासाठी तैनात पोलिसांनादेखील गर्दीला आवरणे मुश्कील झाले होते. यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. या घटनेमुळे काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आली. यानंतर अतिरिक्त फौजफाटा बोलावण्यात आल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवला.