कोरेगाव : निगडी रंगनाथ स्वामी, ता. कोरेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सात दिवस उलटून गेले तरी कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी तपास करून मुलीचा शोध न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पीडित कुटुंबाने दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलीच्या अपहरणप्रकरणात पोलिसांनी टाळाटाळ केली आहे. गुन्हा दाखल होवूनही अपेक्षित तपास झालेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुलीचा तपास करून लवकरात लवकर तिचा शोध घ्यावा. अन्यथा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अशोक जगताप, विजय जगताप, संजय जगताप, विवेक बोरगे, दीपक दिसले, दशरथ कदम, महादेव जगताप यांच्यासह नागरिक उपस्थित होते.