सातारा : सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील १०५ गावे व ३४२ वाड्या पाण्यासाठी तहानलेल्या आहेत. सुमारे १ लाख ३० हजार ६८४ नागरिक व ८८ हजार १०३ जनावरांना सुमारे ९७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अजूनही पावसाने ओढ दिल्यास पाणी टंचाईचा प्रश्न आणखी ऐरणीवर येणार आहे.
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवत असल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होवू लागली आहे. उन्हाळी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली असली तरी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. कडक उन्हामुळे भूजल पातळीत घट निर्माण झाली आहे. विहिरी, नदी, नाले, ओढे, तलावांमधील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. ऐन पावसाळ्यात सुमारे ९७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पावसाने अशीच ओढ दिल्यास आणखी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गहण होणार आहे.
माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही, दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, पळशी, मार्डी, इंजबाव, शिरवली, उकिर्डे यासह ४४ गावे व २६९ वाड्यांमधील ६१ हजार २४६ नागरिक व ५६ हजार ४८८ जनावरांना ४६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी, दातेवाडी, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, यलमारवाडी, तडवळे, गारवडी, मोळ, मांजरवाडी, शिंदेवाडी, रणसिंगवाडी, चिंचणी, नवलेवाडी, पांढरवाडी, कामथी, कातळगेवाडी, रेवलकरवाडी, जाखणगाव, कोकराळे, अंभेरी, गादेवाडी, गोसाव्याचीवाडी, जायगाव, करांडेवाडी, खबालवाडी, नांदोशी, मांडवे, पडळ, कान्हरवाडी यासह ३० गावे व ५८ वाड्यांमधील ३२ हजार ८५९ नागरिक व ५ हजार १५३ जनावरांना १८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
वाई तालुक्यातील ६ गावे व ८ वाड्यांमधील ५ हजार ३९० नागरिक व ८ हजार ३०६ जनावरांना ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यातील एका गावातील व ७ वाड्यांमधील२ हजार ३८९ नागरिक व १ हजार ४८० जनावरांना ८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यातील एका गावामधील ५०६ नागरिक व १८८ जनावरांना एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.