सातारा : सातारा पालिकेने समर्थ मंदिर चौकातील वादग्रस्त इमारत सोमवारी पाडली. न्यायालयाच्या निकालानंतर अतिक्रमण विभागाने कारवाई केली असून समर्थ मंदिर चौकापासून पुढे बोगद्याकडील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली.
सातारा पालिकेने अतिक्रमण, रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर समर्थ मंदिर चौक ते बोगदा या मार्गावरील इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. त्यामध्ये धोकादायक इमारतींचाही समावेश आहे. पालिकेने आतापर्यंत ४० हून अधिक इमारतींना पालिकेने दणका दिला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेने संबंधित मिळकतदारांना कारवाईची इशारा नोटीस दिली होती. मात्र नोटीशीला न धजावणार्या मिळकतदारांवर नाईलाजाने कारवाई करण्यात आली. कारवाई करताना काही मिळकतदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने संबंधित वादग्रस्त इमारत पाडली. आणखी एका इमारतीचा वाद निर्माण झाला असून त्यावरही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे बोगदा परिसरातील मिळकतदारांमध्ये खळबळ माजली आहे. या मिळकतदारांनी सोमवारी पालिकेत येऊन मुख्याधिकार्यांशी चर्चा केली. अतिक्रमणे काढण्यात येणार असून मुख्याधिकारी कारवाईवर ठाम आहेत. त्यामुळे संबंधित मिळकतदारांमध्ये कारवाईच्या भीतीने धाकधूक वाढली आहे. सुमारे ५० मिळकतींवर अद्याप कारवाई होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.