कण्हेर : कोंडवे, ता. सातारा येथील रस्त्यालगतच धोकादायक पाण्याच्या विहिरी उभारलेल्या आहेत. यामुळे या राज्य मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे याठिकाणी बांधकाम विभागाने उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सातारा शहराच्या हाकेच्या अंतरावर कोंडवे गाव हे वसले आहे. या गावातून रहिमतपूर ते मेढा-महाबळेश्वर या राज्यमार्गाचे रुंदीकरण करून नुकतेच नव्याने चौपदरीकरण करण्यात आले. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे रस्त्यालगतच गावातील शेतकऱ्यांच्या दोन ते तीन विहिरी धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. या विहिरी अरुंद व पूर्ण पाण्याने भरल्याने धोका वाढला आहे. या विहिरींमुळे सुसाट वाहणाऱ्या वाहनांचे कंट्रोल सुटल्यास वाहने थेट विहिरत कोसळण्याची भीती आहे. गेल्या आठवड्यापूर्वी नाशिकच्या दिंडोरीत विहिरीत चारचाकी वाहन कोसळून भीषण अपघात झाला. दिंडोरीतील दुर्घटनेची पुनरावृत्ती कोंडवेत होवू नये, यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. या धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची मागणी होत आहे.