सातारा

Satara News: करंजेपेठेत अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडी

जकात नाका ते महालक्ष्मी मंदिर मार्ग धोकादायक; कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कण्हेर : करंजे नाका रस्त्यादरम्यान असलेला परिसर हा अनेक कारणांनी ग्रासला आहे. त्यातच व्यावसायिकांनी रस्त्याकडेलाच अतिक्रमणे केल्याने येथील राज्यमार्ग असलेल्या मुख्य रस्त्याची कोंडी झाली आहे. यामुळे या ठिकाणची वाहतूक मंद गतीने सुरू असून विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांना रस्ता ओलांडताना कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत सातारा पालिकेने कारवाई करून अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

सातारालगत असलेली करंजेपेठ अलीकडच्या काळात झपाट्याने विकसित होऊ लागली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी दुकाने थाटली असून सुमारे चार ते पाच शाळा व हायस्कूल आहेत. यामुळे जकातनाका ते पार व महालक्ष्मी मंदिरापर्यंत प्रचंड वाहतुकीची वर्दळ होत आहे. शिवाय येथील बाजारपेठेमुळे नेहमीच अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. येथील रस्त्याकडेलाच दुकानांच्या पुढे पत्र्यांची शेड उभारलेली आहेत. तसेच रस्त्यालगतच टपऱ्या, गाडे व पत्र्यांचे बॅनर उभारल्याने रस्ता अरुंद होऊन कोंडी होत आहे. यामुळे या परिसरातील रस्त्यावरील रहदारी व वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे.

करंजे नाक्याच्या मुख्य रस्त्यालगतच वाहने उभी केली जात आहेत. नो पार्किंगच्या ठिकाणीही बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. तसेच या रस्त्यालगतच जुनी मोठी घरे असल्याने या ठिकाणच्या वाहतुकीला अडथळा होत आहे. यामुळे येथील वाहतूक व रहदारी सुरळीत करण्यासाठी अतिक्रमणे हटवणे गरजेचे झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT