बामणोली : कास तलावात रविवारी सायंकाळी बुडून बेपत्ता झालेल्या सातारा वनवासवाडी येथील संग्राम हरिभाऊ भंडारे (वय ४५) याचा मृतदेह सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.
वनवासवाडी अमरलक्ष्मी येथील संग्राम भंडारे व त्याचे दोन मित्र असे तीन जण कास परिसरात फिरायला गेले होते. फिरून झाल्यावर ते कास तलाव पाण्याच्या किनारी मद्यपानासाठी बसले. त्यानंतर त्यातील संग्राम व त्याच्या मित्राला पोहण्याचा मोह झाल्याने दोघेजण तलावामध्ये उतरले तर एकजण बाहेर काठावरच थांबला. दोघे आत पोहत गेल्यावर त्यातील संग्राम याला दम लागल्याने तो गटांगळ्या खाऊन पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या दुसऱ्या मित्राने व काठावर थांबलेल्या मित्राने दिल्यावर त्या ठिकाणी कास बोट क्लब, कास ग्रामस्थ व शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम हाती घेतली. मात्र भंडारे यांचा शोध लागला नाही. सोमवारी पहाटे पुनश्च शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने ज्या ठिकाणी संग्राम भंडारे बुडून बेपत्ता झाले होते तेथे शोधमोहीम सुरू केली. बराच काळ शोधमोहीम राबवल्यावर साडेआठच्या सुमारास रेस्क्यू टीमने कास तलावातील ७० ते ८० फूट खोल पाण्यातून संग्राम भंडारे यांचा मृतदेह बाहेर काढला.
या शोधमोहिमेत चंद्रसेन पवार, ऋषीकेश रंकाळे, अथर्व बिडकर, अभिषेक शेलार यांनी सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नामुळे मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मेढा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भिसे यांनी पंचनामा केल्यावर मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.