सातारा : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना सातारा शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने यंदा लाडक्या बाप्पांचे आगमन खडतर मार्गाने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य मूर्ती तसेच घरगुती गणपती घेऊन येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांमधून वाट काढताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
पावसामुळे अनेक रस्त्यांवरील डांबर उखडले असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. गणेशमूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांमुळे मोठे हादरे बसण्याची शक्यता असल्याने मूर्तीला तडे जाण्याची किंवा नुकसान होण्याची भीती मंडळांकडून व्यक्त होत आहे. गणेश आगमन व मिरवणुकीच्या वेळी नागरिक, ढोल-ताशा पथके आणि वाहनांची मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीसह दुचाकी घसरणे, पादचारी जखमी होणे आणि अपघातांचा धोका वाढला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून प्रमुख गणेश आगमन मार्गांवरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश मंडळे व नागरिकांकडून होत आहे. उत्सव तोंडावर आला असतानाही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खड्डे बुजवण्याची मागणी...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन, बांधकाम विभाग यांनी लक्ष घालून गणेश आगमनाच्या प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजवावेत, धोकादायक रस्त्यांची डागडुजी करावी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गणेश मंडळे आणि नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कागदी आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे.
लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून साताऱ्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गणपती मूर्ती खड्यातून आणावे लागणार असे चित्र आहे. त्यामुळे अजून दहा दिवस शिल्लक असून सातारा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे मुजवावे हीच सातारकरांची इच्छा आहे.-मीनाक्षी मोरे, सातारा