कराड : कोणतीही करवाढ व भाडेवाढ नसलेला 7 लाख 18 हजार 223 रुपयांचे शिलकी व 314 कोटी 91 लाख 15 हजार रुपयांचा तरतूद असणारे अंदाजपत्रक नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी शुक्रवारी येथील स्व. यशवंतराव चव्हाण समाधिस्थळावर झालेल्या नगरपालिकेच्या पहिल्या विशेष सभेत मांडला.
यावेळी विरोधकांनी हा अर्थसंकल्पातील त्रुटी मांडून गतवर्षातील कोणतीही दुरुस्ती नसणारा अर्थसंकल्प असल्याचे सांगून हा अर्थसंकल्प बोगस असल्याचा आरोप केला. यावर राजेंद्रसिंह यादव यांनी या अर्थसंकल्पात दुरुस्ती करून यामध्ये अधिकाऱ्यांकडून झालेल्या त्रुटीबाबत योग्य ती दुरुस्ती करणार असल्याचे सांगून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यानंतर हा अर्थसंकल्प एकमताने मंजूर करण्यात आला. नवीन पदाधिकाऱ्यांची पहिलीच सभा असतानाही भाजपच्या नव्या, जुन्या सदस्यांनी मांडलेल्या भूमिका आणि झालेली खडाजंगी यामुळे ही सभा चांगलीच गाजली.
नवीन पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच सभा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळावर घेण्याबाबतची भूमिका मांडताना राजेंद्रसिंह यादव यांनी हे समाधिस्थळ ऊर्जेचे ठिकाण आहे. सत्ता म्हणजे जबाबदारी आहे ही भावना ठेवून याठिकाणाहून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रेरणा व ऊर्जा घेवून पालिकेचा कारभार करायचा आहे, असे सांगितले.
यानंतर नगरसेविका रूपाली माने यांनी बजेटचे वाचन केले. त्यास सुहास पवार यांनी अनुमोदन दिले. या बजेटवर विरोधी गटनेते विजय वाटेगावकर यांनी जोरदार टिका केली. मागील वर्षाच्या दुरुस्तीशिवाय मांडण्यात आलेले बजेट हे आहे. यामध्ये कोणतीही नवी तरतूद नाही, उत्पन्नाचे स्त्रोत नाहीत, भांडवली खर्चाचा भाग नाही, मागील कर्जे दाखवली गेली नाहीत. तसेच सोलर प्लांट, लाईट बिल अग्नीकाष्ट, वाढलेल्या मिळकती, कचरा डेपोची सध्याच्या अवस्था, सीसीटीव्ही घंटागाडी, वाहतूक पार्किंग याव्यतिरिक्त उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र नगरपालिकेने बजेटमध्ये मांडलेले नाहीत त्यामुळे हे बजेट बोगस असल्याचा आरोप केला.
तसेच मुख्याधिक़ारी प्रशांत व्हटकर यांनी या बजेटची कॉपी मागूनही दिली नसल्याचा सांगून प्रशासनाच्या सावळ्या गोंधळावर कडाडून टिका केली. यावर राजेंद्रसिंह यादव यांनी गेल्या चार वर्षात प्रशासक राज असल्यामुळे आणि नवीन अधिकाऱ्यांना बजेटचा अनुभव नसून प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने काम करत असल्याचे सांगितले. यावर वाटेगावकर यांनी या बजेटबाबत अभ्यास होणे गरजेेचे होते. असे सांगून जमा किती खर्च किती याचा लेखाजोखा मांडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरामध्ये प्रशासनामुळे पिछेहाट झाल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अल्ताफ शिकलगार व व विजय वाटेगावकर यांच्यामध्ये मोठी खडाजंगी झाली. यावेळी शिवाजी पवार, आशुतोष डुबल, सुप्रिया खराडे यांनी चर्चेत भाग घेत सुचना मांडल्या.
राजेंद्रसिंह यादव यांनी येत्या 15 दिवसांत वाहतूक आराख्याबाबत मिटिंग घेणार, पार्र्किगची सुविधा करणार, ठेकेदारांना बारचार्टप्रमाणे काम करण्याच्या सूचना देणार, नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणार, 1 महिन्यात ऑनलाईन घरपट्टी, पाणीपट्टी भरण्याबाबत सुविधा करणार तसेच नागरिकांना मोफत वॉटरमीटर देणार असल्याच्या महत्वपूर्ण घोषणा केल्या. याचे सर्व पदाधिक़ाऱ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. आभार उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी मानले.