खेड; अजय कदम : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडत अजितदादांनी केलेले बंड व शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सातारा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दोन्ही गट सातारा तालुक्यात कमकुवत आहे. त्यामुळे गटाची पुनर्बांधणी करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे दोन्ही गटात राजकीय रस्सीखेच होणार आहे. अजितदादांचा हा निर्णय आ. शिवेंद्रराजेंच्या पथ्यावर पडणार की त्यांचीही समीकरणे बिघडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता खा. शरद पवार व ना. अजित पवार या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. 1999 पासून या तालुक्याने शरद पवार यांना साथ दिली. परंतु 2019 मध्ये आ. शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. महाविकास आघाडी काळात उपमुख्यमंत्री असताना ना. अजित पवार यांनी आ. शिवेंद्रराजेंना मोठा निधी दिला. तसेच शिवेंद्रराजे व अजितदादांचे संबध सलोख्यााचे आहेत. शिवेंद्रराजे राष्ट्रवादीतून गेल्यानंतर सातारा तालुक्यात राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक राहिली नव्हती. सातार्यात अजितदादा व शरद पवार या दोन्ही गटाचे जेमतेम कार्यकर्ते आहेत.
त्यामुळे दोन्ही गटाकडून आपला गट मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. सातारा तालुक्यात अजितदादांना मानणारे कार्यकर्ते आहेत. तर शरद पवारांची बाजू घेणार्या पदाधिकार्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पुनर्बांधणीसाठी दोन्ही गटांना खूप संघर्ष करावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर या तालुक्यात शरद पवार यांना मानणार्या गटामध्ये द्धिधा मनस्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्याविषयी प्रेम तर अजितदादा करत असलेली कामे, यामुळे प्रेम की जनतेची कामे याच ओझं कार्यकर्त्यांवर येऊन पडलं आहे. तालुक्यातील कोरेगाव मतदारसंघात विभागलेल्या 36 गावांवर आ. शिवेंद्रराजे, आ. शशिकांत शिंदे व आ. महेश शिंदे यांचा पगडा आहे. या ठिकाणी शशिकांत शिंदे हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अजितदादांना नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागणार आहे. अजितदादा कामे वेगाने करत असल्याने बहुतांश पदाधिकार्यांची पहिली पसंती अजितदादाच आहेत. त्यामुळे शरद पवारांचा गट वाढवण्यासाठी शशिकांत शिंदेंना जीवाचे रान करावे लागणार आहे.
या भागात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष उफाळून येणार असून शरद पवार गटाच्या आ. शशिकांत शिंदे व कार्यकर्त्यांची पक्षसंघटनात्मक बांधणीसाठी कसोटी लागणार आहे. भविष्यात या भागातील आणखी कोण कोण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणार याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे या 36 गावांमध्ये राजकीय वणवा पेटणार असल्याचे चित्र आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटातील राजकीय संघर्ष आगामी काळात विकोपाला जाणार आहे. दोन्ही नेते पदाधिकार्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील. या परिस्थितीत राष्ट्रवादीतील ही फूट कुणाच्या पथ्यावर पडणार? हे निकालानंतरच समोर येणार आहे. असे असले तरी दोन्ही गटांना आपला गट मजबूत करण्यासाठी नवीन आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.