सातारा : शेतीला जोडधंदा म्हणून पुशपालनाला प्राधान्य दिले जाते. या जनावरांच्या चाऱ्यासाठी कडब्याची गंजी लावून साठवण करण्यात येत आहे. ज्वारीच्या क्षेत्रात घट झाल्याने तसेच काढणी, बांधणीसह उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कडब्याचे दर भडकले आहेत. पशुपालन व चाऱ्यालाही वाढत्या महागाईची झळ बसत असल्याने पशुधन सांभाळताना पशुपालक आर्थिक अडचणीत आले आहेत.
सध्या ज्वारीची सुगी अंतिम टप्प्यात आली असून शेतकरी वर्गाची ज्वारी काढणी, कापणी व मळणीची लगबग सुरु आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पुशपालनाला प्राधान्य दिले जाते. रब्बी हंगाम संपताच ओल्या चाऱ्याचा तुटवडा भासतो. कडक उन्हाळा सुरु झाल्याने जनावरांच्या वर्षभराच्या वैरणीची सोय करण्यासाठी पशुपालकांची लगबग सुरु झाली आहे. ज्वारीच्या कडब्याची खरेदी करुन तो गंज लावून रचून ठेवला जातो. यावर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला असला तरी लांबलेला परतीचा पाऊस, ढगाळ हवामान, चिकटा व रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसला आहे.
परिणामी ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. चारा टंचाईमुळे कडब्याला मागणी वाढली आहे. तसेच ज्वारी काढण्यासाठी एकरी 6 ते 7 हजार तर कडबा बांधणीचेही 500 रुपये शेकडा असे दर आकारले जात आहेत. आधीच शेतमालाला दर मिळत नसला तरी खते औषधांचे दरवाढ सुरुच आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला असतानाच चाराटंचाईची धास्ती व दराच्या तेजीमुळे पशुपालक आर्थिक संकटात सापडला आहे.