सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर शनिवारी कायम होता. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कृष्णा, वेण्णा, उरमोडी, नीरा, तारळी, कोयना नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांकडे गेला आहे. रविवारी व सोमवारी घाट क्षेत्रामध्ये ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्यांच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. मात्र, शनिवारी सातारा शहर परिसरात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सायंकाळनंतर पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे सकाळी १० वाजल्यापासून कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे ४ फुटांवरून ६ फुटांपर्यंत उघडून ३३ हजार ८२६ क्युसेक विसर्ग, तर विद्युतगृहातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे.
धोम धरणातून ५ हजार ४७२ क्युसेक विसर्ग, धोम बलकवडी धरणातून १ हजार ७९६ क्युसेक, कण्हेर धरणातून ३ हजार ९७५ क्युसेक, उरमोडी धरणातून २ हजार ९७३ क्युसेक, तारळी धरणातून ३ हजार ९८८ क्युसेक, वीर धरणातून १४ हजार ७८१, मोरणा धरणातून २ हजार २७६, उत्तरमांड धरणातून ३ हजार १४६, तर वांग मराठवाडी धरणातून १ हजार १७८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणांतून विसर्ग होत असल्याने कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळी, नीरा या नद्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.