सातारा : पावसाळा तोंडावर आला तरी टंचाईच्या झळा काही कमी होत नाहीत. जिल्ह्यातील खंडाळा, जावली, महाबळेश्वर व कराड तालुक्यांतील भूजल पातळी घटली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील 106 विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये भूजलपातळी गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा 7.27 मीटरवर स्थिर आहे; मात्र माण, खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या जिल्ह्यातील 106 विहिरी आहेत. या विहिरीच्या माध्यमातून भूजलपातळीचे नुकतेच सर्वेक्षण झाले. ही भूजलपातळी मागील पाच वर्षाच्या मार्च महिन्यामधील सरासरी तुलनात्मक स्थिती विचारात घेऊन भूजलपातळी निश्चित होते. जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच भूजल पातळी खालावली असल्याने टंचाईची तीव्रता वाढली.
त्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणे, तलावामधील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे टंचाई अधिक भासत आहे. जिल्ह्यातील 89 गावे व 283 वाड्यांमधील 1 लाख 14 हजार 348 नागरिक व 67 हजार 435 जनावरांना 78 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.