सातारा : जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी आजी आजोबांची शाळा भरली होती. त्यांनी नातवाच्या वर्गातच परीक्षा दिली. सुमारे 7 हजार 149 असाक्षरांनी परीक्षेसाठी हजेरी लावली होती.
केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता वाचन लेखन व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीचे आयोजन जिल्ह्यात रविवारी सकाळी 10 ते 5 दरम्यान करण्यात आले.11 तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर 7 हजार 149 असाक्षर व्यक्तींनी परीक्षा दिली. त्यामध्ये 5 हजार 887 महिला तर 1 हजार 262 पुरूषांचा समावेश होता. उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पंधरा वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींमध्ये वाचन लेखन व संख्याज्ञान अशी मूलभूत साक्षरता विकसित करण्याबरोबर जीवन उपयोगी कौशल्य विकसित करण्यावर भर दिला आहे. तालुकास्तरावर परीक्षेचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान असाक्षर व्यक्तींचा उत्साह दिसून आला. या परीक्षेस राज्यस्तरावरुन माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी खंडाळा तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या. शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, धनंजय चोपडे, शबनम मुजावर यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.