सातारा : सातारा जिल्ह्यातील मागील वर्षभरात मुदत संपलेल्या 145 आणि सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या 871 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक होईपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले जात आहेत. जिल्ह्यातील 871 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याबाबतची कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत सातारा तालुक्यातील 128, कोरेगाव 56, खटाव 90, माण 61, फलटण 80, खंडाळा 57, वाई 76, महाबळेश्वर 40, जावली 72, कराड 104, पाटण 107 असे मिळून 871 ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आहेत. तर सर्वात जास्त फेब्रुवारी महिन्यात सुमारे 865 ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची तरतूद आहे. उच्च न्यायालयाच्या अवमान होणार नाही याची दक्षता घेवून राज्यामध्ये जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपेल किंवा नव्याने निवडणूक होईल त्यावर जोपर्यंत सदस्य निवडून येत नाहीत, ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाहीत, तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहेत. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. या प्रशासकाच्या माध्यमातून गावचा कारभार चालवला जात आहे. जोपर्यंत नवीन सरपंच व सदस्य निवडून येत नाहीत. तोपर्यंत प्रशासक कामकाज पाहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या 871 ग्रामपंचायतीवर प्रशासनामार्फत प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.