सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वाहतूक कोंडी टाळणे, अपघातांना आळा घालणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा पोलिसांनी अंतर्गत वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे आदेश १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
गणेश मंडळांचे मंडप ज्या बाजूला उभारण्यात आले आहेत, त्याच बाजूला १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान वाहने पार्क करावी लागणार आहेत. तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ६ ते १० या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे. या वेळेनंतर शहरात आढळणाऱ्या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
राजपथ रोड, शाहू चौक ते समर्थ मंदिर रोड तसेच मोती चौक ते पोवई नाका या मार्गांच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने आणि स्थानिक रहिवाशांची कायमस्वरूपी पार्क केलेली वाहने १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान हटवून पर्यायी पार्किंगच्या ठिकाणी लावावी लागणार आहेत. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा पोलिस दलाने केले आहे.
पार्कींगसाठी दोन पर्याय...
उत्सवाच्या काळात सातारा शहरात खरेदीसाठी चारचाकी वाहनाने येणार्या नागरिकांसाठी तालीम संघ आणि राजवाडा येथील आळूचा खड्डा वाहनतळ येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी या दोन्ही ठिकाणी वाहने पार्क करावीत, असे आवाहन करण्यात आले.