मिरज : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या साताऱ्यातील चौघांना केंद्रीय सेवेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तब्बल 22 लाख 9 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल. याप्रकरणी तानाजी शंकर देवकर (रा. बनवपुरी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी तिघांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वैभव अण्णासाहेब बंडगर, विशाल अण्णासाहेब बंडगर आणि अन्नपूर्णा वैभव बंडगर (सर्व रा. टाकळी, ता. मिरज) यांचा समावेश आहे. फिर्यादी तानाजी देवकर हे व त्यांचे काही मित्र स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते. ते नॉन क्रिमिलेअर दाखला काढण्यासाठी साताऱ्यात गेले असताना त्यांची एकाशी ओळख झाली. त्याने मिरज तालुक्यातील टाकळीत एकजण केंद्रीय पत्रकार आहे. तो नोकरी लावून देतो, असे त्यांना सांगितले. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये फसवणूक झालेले तरुण आणि वैभव बंडगर याची भेट झाली. प्रत्येकी 10 लाख रुपये दिल्यानंतर परीक्षा न देता दिल्ली पोलिस, रेल्वेमध्ये टीसी, इन्कमटॅक्स विभागात नोकरी लागेल, असे त्याने सांगितले.
त्यानंतर मात्र त्याने 2022 मध्ये मुलाखत द्यावी लागेल, असे सांगून देवकर यांना मुंबई येथे नेले. तेथे मुलाखत न देताच रेल्वेमध्ये नोकरीचे काम झाल्याचे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळली. तसेच जॉइनिंग लेटर पोस्टाने येईल, असे सांगतले. त्यानंतर देवकर यांच्याकडून त्याने वेळोवेळी 19 लाख 74 हजार रुपये घेतले. इतर तिघांकडूनही रक्कम घेतली. या चौघांकडून त्याने सुमारे 22 लाख रुपये घेतले. चौघांनी पैसे देऊनही त्यांना जॉईनिंग लेटर आले नाही. तर अन्नपूर्णा हिने ‘या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. वैभवशी माझा घटस्फोट झाला आहे’, असे सांगून पुन्हा फोन केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
वैभव बंडगरकडून अनेकांना गंडा
बंडगर हा आपण केंद्रीय पत्रकार असल्याचे सांगतो. त्याने केंद्रात ओळख असल्याचे भासवून अनेकांना गंडा घातला आहे. ही कोट्यवधींची फसवणूक आहे. सध्या साताऱ्यातील चौघांची फसवणूक समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातही अनेकांना त्यांने गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे.