सातारा : सातारा जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे सर्वच धरणांत 74 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणांतील पाणी साठ्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
जिल्ह्यात 15 मेपासून पावसाने हजेरी लावली आहे. सुमारे दोन महिने पावसाची संततधार कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी जुलैपर्यंत सर्व धरणांत 100 टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.
कोयना धरणात मंगळवारचा उपयुक्त पाणीसाठा 71.620 टीएमसी आहे. ही टक्केवारी 71.53 आहे. 8 हजार 470 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. विद्युत गृहातून 2 हजार 100 तर सांडव्यातून 9 हजार 300 क्युसेक असे मिळून 11 हजार 400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धोम धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 9.020 टीएमसी आहे. 77.16 टक्के पाणी असून, 495 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धोम बलकवडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 2.710 टीएमसी आहे. धरणात 68.43 टक्के पाणी असून, 393 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कण्हेर धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 7.620 टीएमसी आहे. 79.46 टक्के पाणी आहे. 536 क्युसेक पाण्याची आवक होत असून, विद्युतगृहातून 300 क्युसेक विसर्ग वेण्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
उरमोडी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 7.400 टीएमसी असून 76.68 टक्के पाणी आहे. 300 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तारळी धरणात आजचा उपयुक्त पाणीसाठा 4.910 टीएमसी असून 84.08 टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्प असलेला येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी ही धरणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच 100 टक्के भरली आहेत. नागेवाडी 88.46 टक्के, मोरणा 62.31 टक्के, उत्तरमांड 68.49 टक्के, महू 80.09 टक्के, हातगेघर 46.80 टक्के, वांग-मराठवाडी धरणात 72.65 टक्के पाणी आहे.