सातारा; पुढारी वृत्तसेवा : खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पांगारे, ता. सातारा येथील राहुल शिवाजी पवार (वय 30) या तरुणाचा मृतदेह ग्रामस्थांनी रविवारी दुपारी 1 वाजता रुग्णवाहिकेसह पोलिस मुख्यालयासमोर आणला. त्यामुळे मुख्यालयासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पसार असलेल्या संशयितांना अटक करून त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका ग्रामस्थांनी पांगारेकडे नेली.
सातारा तालुक्यामध्ये परळी खोर्यात पांगारे आणि राजापुरी ही दोन गावे शेजारी-शेजारी आहेत. 5 मे रोजी एका अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून वाद झाला होता. यातूनच राजापुरीमधील 30 हून अधिक तरूण काठ्या, लोखंडी रॉड घेऊन मध्यरात्री पांगारेत पोहोचले. त्यांनी राहुल पवार आणि नयन पवार यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. राहुलला घराबाहेर बोलावून संशयितांनी जबर मारहाण केली होती. यामध्ये राहुल गंभीर जखमी झाल्याने त्याला पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यातील सर्व संशयितांना पोलिसांनी अटक न केल्याने पांगारेचे ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
शनिवारी राहुलचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह पोलिस मुख्यालयासमोर आणण्यात आला. यावेळी पांगारेतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी ग्रामस्थांनी राहुलवर हल्ला करणार्यांमध्ये पोलिस व राजकारण्यांची मुले आहेत. त्यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करावे तसेच सर्व संशयितांना अटक करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तो बंदोबस्त पोलिसांनी केला होता.
ग्रामस्थांच्या या जमावाला सातार्याचे पोनि हेमंतकुमार शहा व शाहूपुरीचे पोनि धनंजय फडतरे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव आक्रमक होत संशयितांना अटक झाल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. संयमाने अधिकार्यांनी जमावाला कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. या प्रकरणात जी नावे येतील त्यातील कोणाचीही गय केली जाणार नाही. संशयितांच्या शोधासाठी 4 पथके रवाना केली आहे. संशयितांना अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच ग्रामस्थांनी रूग्णवाहिका पांगारेकडे नेली.