सातारा : पुणे बंगळूर महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा बसस्थानकाचा उकीरडा झाला आहे. कचऱ्याचे ढिगच्या ढिग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच कचऱ्याचा राडारोडा निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने प्रवाशी व नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
सातारा बसस्थानकातून दररोज पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव, कोकण, गोवा, विजापूर, नांदेड, शिर्डी, यासह अन्य जिल्ह्यात बसेस ये-जा करत असतात. हजारो बसेसच्या फेऱ्या होत असतात. त्यामुळे बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. सध्या जुन्या मुंबई, पुणे फलाट परिसरात बसस्थानकातील कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसरात कचऱ्याचे ढिगच्या ढिग साचले आहेत. कचऱ्यामुळे बसस्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. कचरा अस्ताव्यस्त पडला असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
एसटी महामंडळाने दररोज या ठिकाणचा कचरा उचलला पाहिजे तरच परिसर स्वच्छ राहणार आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने एसटी कर्मचारी व प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच माशा व डासांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यासाठी एसटी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.