कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन करण्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर सातार्‍यातील वकीलांनी कोल्हापूर येथे जल्लोष केला. Pudhari Photo
सातारा

Kolhapur Circuit Bench : कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सातार्‍यात जल्लोष

वकील संघटनांचा आनंदोत्सव : जिल्ह्यातील पक्षकारांना होणार फायदा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यासंबंधीची अधिसूचना शुक्रवारी जारी झाल्यानंतर सातार्‍यात वकील, पक्षकार मंडळींनी जल्लोष केला. गेल्या चार दशकाहून अधिक काळ यासाठी लढाई सुरू होती. याप्रश्नी दै. ‘पुढारी’नेही मोठा लढा उभारला होता. आता कोल्हापूर सर्किट बेंचमुळे सातारा जिल्ह्यालाही फायदा होणार आहे.

कोल्हापूर येथे सर्किट बेंच व्हावे, यासाठी कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातून मोठा उठाव झाला होता. ‘दै. पुढारी’नेही हा विषय अजेंड्यावर घेत धसास लावला. सातारा जिल्हा बार असोसिएशनने अनेक प्रकारची आंदोलन केली. सातार्‍यात 58 दिवसांचे आंदोलनही करण्यात आले होते. पक्षकारांसह सामाजिक संस्था यांचाही या आंदोलनाला पाठींबा होता. सातार्‍यातील वकील व पक्षकारांना खटले चालवण्यासाठी मुंबईला जाणे खर्चिक व वेळखावूपणाचे होते. पक्षकारांच्या खिशाला मोठी कात्री यामुळे लागत होती. मागणीचे आंदोलन झाल्यानंतर सरकार दरबारी तात्पुरती मलमपट्टी होऊन आश्वासन मिळायचे. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही होत नव्हती.

अखेर कोल्हापूर येथे सर्किट बेंचला मान्यता मिळाल्यानंतर आतापर्यंत झालेल्या आंदोलनाला हे मोठे यश आले आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील पक्षकार, वकील संघटना व नागरिकांकडून स्वागत होऊन चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

गेल्या 40 वर्षाहून अधिककाळ यासाठी लढा दिला आहे. सातारा जिल्हा बार असोसिएशन संघटनेच्या वतीने कोल्हापूर सर्किट बेंच होण्यासाठी सर्व आंदोलनात सहभागी झाली होती. सर्व जिल्ह्यासोबतच सातार्‍याने खंडपीठासाठी लढाई उभारली होती. यासाठी अनेक मातब्बरांचा सहभाग व मार्गदर्शन राहिले असून ही लढाई जिंकल्याचा आम्हाला आनंद आहे.
- अ‍ॅड. सयाजीराव घाडगे, अध्यक्ष सातारा जिल्हा बार असोसिएशन.
कोल्हापूर येथे सर्किट बेंच व्हावे यासाठी सातारा जिल्ह्यातील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी यांनी मोठा लढा उभारला होता. सर्किट बेंचला प्रशासकीय स्तरातून हिरवा कंदील मिळाल्याने वकील संघटनेचे व प्रशासनाचे अभिनंदन. सातार्‍यातून कै.अ‍ॅड. डी. व्ही. पाटील हे स्वत: या मोहिमेत होते व त्यांनी आंदोलनासाठी मार्गदर्शन केले आहे. या सर्किट बेंचमुळे सातारा जिल्ह्यातील पक्षकारांचा आर्थिक व मानसिक भार निश्चित हलका होणार आहे.
- शंकर माळवदे, माजी उपगनराध्यक्ष व पक्षकार.
कोल्हापूर सर्किट बेंच हा ऐतिहासीक निर्णय असून, सामान्य नागरिक यांना केंद्रबिंदू मानून झालेला हा योग्य निर्णय आहे. कोल्हापूर सर्किट बेंच होणे ही काळाची गरज होती. सातारा जिल्ह्यात यामुळे आनंदाचे वातावरण असून आम्ही त्याचे स्वागत करत आहोत.
-अ‍ॅड.महेश कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT