वेळे : भुईंज, कुडाळ, बावधन परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांतून जनावरे चोरणाऱ्या पिकअप गँगला भुईंज पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेने तिघांना अटक केली आहे. सर्व संशयित हे वाई तालुक्यातील असून चोरी केलेली जनावरे परराज्यात विकल्याची कबुली या टोळीने दिली आहे.
सुरेश ऊर्फ सुर्यकांत आनंदराव चव्हाण (वय ३५, रा. पाचवड, ता. वाई), संदेश हणमंत पिसाळ (वय २७, रा. व्याजवाडी, ता. वाई), हर्षद हिंदुराव चव्हाण (वय १८, रा. कडेगांव, ता. वाई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी कवठे, ता. वाई येथील किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यातून दोन म्हैशी चोरीस गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचबरोबर बावधन, भुईंज परिसरातही जनावरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.
याचा तपास करण्यासाठी सपोनि पृथ्वीराज ताटे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. या तपासासाठी डीबीचे पथक मागावर होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित पिकअपमधून वाईहून पाचवडच्या दिशेने येत असल्याची माहिती डीबीच्या पथकाला मिळाली. यानंतर पाचवड चौकातच भुईंज पोलिसांनी सापळा रचला. मिळालेल्या माहितीची पिकअप दिसताच पोलिसांनी पिकअप अडवून संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत कवठे येथून दोन म्हैशी, ओझर्डे येथून एक म्हैस, खडकी येथून एक जर्शी गाय तसेच कुडाळ येथून दोन म्हैशी चोरून त्या पुण्यातील चाकण, अहिल्यानगरमधील काष्टी-श्रीगोंदा व सोलापूरमधील सांगोला येथील गुरांच्या बाजारात विकल्याचे कबुल केले. याप्रकरणी गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त करण्यात आली असून, चोरीची जनावरे कोणत्या व्यापाऱ्यांना विकली याचा शोध घेऊन ती परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई सपोनि पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तसेच पोहवा नितीन जाधव, पोहवा धायगुडे, पोकॉ सोमनाथ बल्लाळ, पोकॉ सागर मोहिते, हवालदार किरण निंबाळकर यांच्या पथकाने पार पाडली.