पाचगणी : पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भिलार येथील उपकेंद्रातील आरोग्य सेवांचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य केंद्रात सकाळी सेवा सुरू असली तरी दुपारनंतर मात्र केंद्राला टाळे लागलेले दिसत आहेत. दुपारनंतर रूग्णांची फरफट होत असल्याने डॉक्टरांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भिलार हे पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असून येथे कासवंड, उंबरी, दानवली, धामुणसेवाडी, घोटेघर, अखेगणी, भोसे या परिसरातील नागरिक उपचारासाठी येतात. दररोज अनेक रुग्ण तपासणी, औषधे व प्राथमिक उपचारांसाठी या उपकेंद्रावर अवलंबून असतात. मात्र दुपारनंतर उपकेंद्र बंद असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. अनेक जण केंद्रारा टाळे बघून परत फिरावे लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसत आहे. 65 ते 70 वर्षांवरील वृद्धांना नियमित तपासणीची गरज असताना त्यांना घरी जाऊन सेवा देण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहत आहेत. उपकेंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील पाचगणी येथे जावे लागत आहे.
अनेकांना हे अंतर पायी पार करावे लागत असून, वेळ, श्रम आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन भिलार उपकेंद्र दुपारनंतरही सुरू ठेवावे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.