महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या अंबेनळी घाटात गुरुवारी सायंकाळी दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा दरीत कोसळून मृत्यू झाला. सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोहन चव्हाण आणि राजश्री चव्हाण (रा. वाई) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. महाबळेश्वरपासून सुमारे 18 कि.मी. अंतरावर प्रतापगड कमानीनजीक ही दुर्घटना घडली. महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमने दरीत उतरून मदतकार्य राबवले. मृत दाम्पत्य भंगार व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांत दाम्पत्यांच्या अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पाटण तालुक्यात नवविवाहित दाम्पत्य लग्नानंतर अवघ्या 10 दिवसांतच अपघातात ठार झाले. तर राजुरी, (ता. फलटण) येथे दुचाकीवरून लग्नाला जात असलेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. गुरुवारी अंबेनळी घाटात एका दाम्पत्याला भीषण अपघातात जीव गमवावा लागला. हे दाम्पत्य पोलादपूरहून वाईकडे परत येत होते. त्यांच्या दुचाकीवर भंगार वस्तूंची गाठोडी होती. प्रतापगडच्या कमानीनजीक दुचाकी आली असता नियंत्रण सुटल्यामुळे ती रस्त्याच्या कडेला गेली.
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रेलिंगच्या मध्ये असणाऱ्या जागेच्या ठिकाणी धडकली व दुचाकी रस्त्याकडेलाच अडकून चव्हाण दाम्पत्य 300 फूट खोल दरीत कोसळले. बचाव पथकाने खोल दरीत उतरून या दोन्ही टीमने मदतकार्य सुरू केले. रात्रीच्या काळोखात ट्रेकर्सच्या जवानांनी दरीत उतरून हे मृतदेह बाहेर काढले. या शोध मोहिमेत नगरसेवक कुमार शिंदे, सुनील भाटीया, अमित कोळी, सुजित कोळी, अनिकेत वागदरे, मृणाल उत्तेकर, ऋषीकेश जाधव, आशिष बिरामणे, जयवंत बिरामणे यांनी सहभाग घेतला.