सातारा : छत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याला अतिक्रमणांचा वेढा पडत चालला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातच एक स्टॉल टाकण्यात आला असून अतिक्रमणे वाढत गेल्यास या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य व सौंदर्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. सातारा पालिकेने काळ सोकावण्याआधीच याला आवर घाला, अशी मागणी सातारकांमधून होत आहे.
अजिंक्यतारा किल्ला हा सातार्याच्या गौरवाशाली इतिहासाचे, छत्रपतींच्या शौर्याचे व मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे. भावी पिढ्यांसाठी हा ऐतिहासिक वारसा जपणे ही सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, प्रवेशद्वारावरच स्टॉल उभा राहिल्याने किल्ला परिसराचे बकालपण वाढण्यास सुरूवात झाली आहे. आज एक स्टॉल लागला उद्या आणखी येतील, अतिक्रमणे हळूहळू वाढत जातील आणि मग ती काढणे कठीण होऊन बसते, असा सातारकरांना अनुभव आहे.
अतिक्रमणांमुळे किल्ल्याच्या परिसरात कचरा व अस्वच्छता वाढते. पर्यटकांना नाहक त्रास होतो. किल्ल्याच्या ऐतिहासिकतेला तडा जातो. पर्यटकांवर व विद्यार्थ्यांवर याचा विपरित परिणाम हेातो. अतिक्रमण करणारा गरीब असो वा श्रीमंत असो अतिक्रमण हे अतिक्रमणच असते. त्याला कोणत्याही सबबीची झालर लावता येत नाही. सातारा पालिकेने तातडीने हे अतिक्रमण हटवून अजिंक्यतारा किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखावे, अशी मागणी सातारकरांसह इतिहासप्रेमींतून होत आहे.