सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. वाढत्या उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत राखीव बेड सज्ज ठेवले आहेत. तर आरोग्य केंद्रात ओआरएस कॉर्नरची संकल्पना राबवण्यात आली आहे.
उष्माघातामुळे रुग्णांचा मृत्यूही संभवतो. उष्माघाताबाबत उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील 84 प्राथमिक आरोग्य केंद्र व 418 उपकेंद्रांच्या ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णांकरता एक बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचप्रमाणे प्रत्येक आरोग्य संस्थेच्या ठिकाणी ओआरएस कॉर्नर केला असून तेथे उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्यांना ओआरएस देण्याकरता सोय केली आहे. सरकारी माहितीनुसार आजपर्यंत जिल्ह्यात एकही उष्माघाताचा रुग्ण आढळलेला नाही. सुरुवातीला रुग्णास थकवा येणे, तहान लागणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे अशी लक्षणे अचानक होऊ शकतात.
सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून त्यामुळे वातावरणातही तापमान वाढ झाली आहे. शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याकरिता ठराविक वेळेत फलाहार, उसाचा रस, लिंबू पाणी, ताक व जास्तीत जास्त पाणी प्यावे, जेणेकरून शरीरातील पाण्याची पातळी समतोल राहून उष्माघाताचा त्रास होणार नाही. दुपारच्यावेळी घराबाहेर पडू नये.डॉ. महेश खलीपे, जिल्हा आरोग्य अधिकारी