सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटातील काळजाचा ठाव घेणाऱ्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला असतानाच मंगळवारी पहाटे आसगाव, मर्ढे आणि खटाव या गावांमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या अंत्यसंस्कारावेळी दुःखाचा बांधच फुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहाटेच्या निरव शांततेला भेदून निघालेल्या मित्रांच्या अंत्ययात्रांनी या तीन गावांमधील वातावरण अक्षरशः सुन्न झाले. रस्ते अबोल अन् आख्खं गाव नि:शब्द झाले.
आसगाव येथे पाच जिवलग मित्रांवर सामूहिक अंत्यसंस्कार झाले. रात्रीपासूनच गावातील रस्ते, घरांचे उंबरठे आणि स्मशानभूमीकडे जाणारे मार्ग अश्रूंनी ओले झाले होते. आदित्य साळुंखे, महेश पवार, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे आणि अंश चव्हाण यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. ‘कालपर्यंत हसतखेळत राहणारी पोरं आज कायमची शांत झाली...’ या भावूक शब्दांत ग्रामस्थांच्या भावना व्यक्त होत होत्या.
मर्ढे गावात निखिल शिंगटे आणि उत्कर्ष शिंगटे या दोघा जिवलग मित्रांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. कृष्णाकाठचे हे गाव त्यांच्या अंत्ययात्रेदरम्यान गहिवरून गेले होते. एकाचवेळी दोन तरुण मित्रांच्या चितांना अग्नी देताना उपस्थितांचे डोळे पाणावले. गावातील अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
खटाव येथे संदीप काटकर याच्यावर अंत्यसंस्कार करताना संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. त्याच्या नातेवाईकांना धीर देताना ग्रामस्थांनाही अश्रू अनावर होत होते.