सातारा : इस्रायल अणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्ध भडकले आहे. या युद्धात सातारा जिल्ह्यातील सुमारे 24 जण अडकले असल्याचे समोर आले आहे. संबंधित पर्यटकांच्या संपर्कात राज्य शासनासह जिल्हा प्रशासून असून संबंधित पर्यटक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित पर्यटकांच्या सुरक्षेचा व आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला.
दुबईत अडकलेले लोक पर्यटन आणि वैयक्तिक कारणासाठी गेले होते. अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हवाई सेवा तसेच वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने त्यांची परतीची प्रक्रिया थांबली; मात्र राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन संबंधित पर्यटकांच्या संपर्कात सातत्याने असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. दुबईमध्ये अडकलेल्या
नागरिकांमध्ये सातारा जिल्ह्यातील 24 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये सातारा 6, पाचगणी 7 आणि कराडमधील 11 जण आहेत. यातील काही पर्यटकांचा दुबईतील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तातडीने या परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाच्यावतीने संबंधितांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाशीही संपर्क साधण्यात आला असल्याचे कळते.
परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर किंवा सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्यानंतर संबंधित पर्यटकांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, संबंधित पर्यटकांच्या कुटुंबियांमध्ये सुरूवातीला चिंतेचे वातावरण होते. मात्र प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासक माहितीनंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात आणि भारतीय दुतावासाशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी राज्य शासनाकडून हालचाली सुरू असून परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, इराणमध्ये अमेरिका आणि इस्राईल या देशांकडून युद्धजन्य कारवाई सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. आपल्या जिल्ह्यातील कोणताही नागरिक संबंधित देशाच्या कोणत्याही भागात असेल आणि त्याला अडचणीचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच महाराष्ट्र सरकारच्या संपर्क कक्षाशी किंवा भारतीय दुतावासाशी संपर्क साधावा.
संबंधित देशातून परतीच्या प्रवासाची व्यवस्था होत नसल्याने राज्य किंवा केंद्र सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. राज्याच्या आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा. परदेशात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी सातारा जिल्हा प्रशासन नियंत्रण कक्षाच्या (02162) 232175, 233833 किंवा मंत्रालयीन नियंत्रण कक्षाच्या 9321590561 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधवा. जिल्ह्यातील कुठलाही नागरिक इराण किंवा संबंधित देशात अडकला असल्यास त्यांच्या मदतीसाठी संबंधितांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळींनी घाबरून न जाता संपर्क साधल्यास आवश्यक मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले.