सातारा: सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र, दुसरीकडे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील १११ गावे व ३९० वाड्या तहानलेल्या आहेत. या गावांना ९९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास पाण्याचे टँकर कमी होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याचे टँकर सुरू झाले. जसजशी उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली तसे गावोगावी पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला. कडक उन्हाळ्यामुळे विहीरी, तलाव, नदी, नाले, ओढे, धरणातील पाणी पातळीत घट होवू लागली. त्यामुळे गावोगावी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सध्या गेल्या दोन दिवसापासून जिल्हात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत तरीही गावोगावी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
खटाव तालुक्यात सुर्याचीवाडी, मोराळे, एनकुळ, कणसेवाडी, खातवळ, यलमरवाडी, तडवळे, गारवडी, मोळ, मांजरवाडी, रणसिंगवाडी, नवलेवाडी, कातळगेवाडी, जाखणगाव, कोकराळे, अंभेरी, जायगाव, नांदोशी, पडळ यासह २४ गावे व ६१ वाड्यांना १५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील बिचुकले, विखळे, फडतरवाडी, चवणेश्वर, मोरबेंद, नायगाव, अनपटवाडी, सोळशी, पिंपोडे बु., रणदुल्लाबाद, अंबवडे संमत वाघोली,गुजरवाडी, हासेवाडी, नागेवाडी, बोधेवाडी (चि.), चौलेवाडी, शेल्टी, भांडारमाची, बोरजाईवाडी, तळीये, जाधववाडी, भावेनगर, करंजखोप, कुमठे, अनभुलेवाडी, खिरखिंडी यासह २७ गावांना ३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.