सातारा : जिल्ह्यातील गेल्या अडीच वर्षांत मुदत संपलेल्या 1 हजार 13 ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींची आरक्षण प्रक्रिया राबवण्याचे आदेश महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे. सातारा तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती असून त्यांची संख्या 145 इतकी आहे.
कराडमध्ये 133, पाटणमध्ये 120, खटावमध्ये 110, फलटणमध्ये 102, कोरेगाव 78, वाई 76, खंडाळा 61, माण 61, जावली 79 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जिलह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक तयारीला वेग येणार आहे.