सातारा : तुळापूर (ता. शिरूर) (बलिदान स्थळ) व वढू बुद्रूक (समाधी स्थळ) येथे उभारल्या जाणाऱ्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या विकास आराखड्यातील वाढीव कामांना राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. मान्यता दिलेल्या 282.24 कोटींच्या सुधारित व विकास आराखड्यात आता 247.63 कोटी इतकी वाढ होऊन हा विकास आराखडा 529.87 कोटी किमतीच्या सुधारित आराखड्यास मान्यता दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
मंत्री भोसले यांनी काही दिवसांपूर्वी वढू-तुळापूर येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर विविध कामे करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून सदर कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ना. भोसले यांनी केली होती. त्यानुसार ना. भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले.
मूळ आराखड्यात सुधारणा करताना विविध पायाभूत सुविधा व अतिरिक्त कामांचा समावेश केला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन सुधारित आराखड्याची एकूण किंमत सुमारे 529.87 कोटी रुपये इतकी झाली आहे. यामध्ये भीमा नदीवरील आपटी येथे पूल बांधकाम, रस्त्यांचे रूंदीकरण तसेच इतर पूरक सुविधांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर रस्ता विकास, पूल, सांस्कृतिक ध्वज उभारणी, भूसंपादन यासारख्या घटकांचे सादरीकरण केले होते. हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
आपटी ते तुळापूर दरम्यान ग्रीनफिल्ड रस्ता विकसित केला जाईल. तसेच, पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने स्थानिकांना गाईड प्रशिक्षण, गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा उभारण्यावरही भर दिला जाणार आहे.