सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वेळे ढेण ता. जावली येथील प्रकल्पग्रस्तांचे जमीन व आर्थिक मोबदला आदी प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करा. आलवडी ता. सातारा येथील धोकादायक घरांचे पुनर्वसन भूस्खलन होणार नाही अशा ठिकाणी झाले पाहिजे, याबाबतही तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे ना. शिवेंद्रराजे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रश्न मार्गी लावणे तसेच ठोसेघर, कुसुंबी, कास, भांबवली या पर्यटन स्थळांचा विकास यासंदर्भात आढावा बैठक झाली. याप्रसंगी ना. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, सदस्य अजित साळुंखे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मनोहर गव्हाड, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सह्याद्री व्याघ्र राखीवचे उप संचालक किरण जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सातपुते, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव यांच्यासह विविध अधिकारी, वेळे ढेण, आलवडी, आंबळे आदी गावातील ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेऊन त्यावर योग्य तोडगा तातडीने काढण्याच्या सूचना ना. शिवेंद्रराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. याबाबतचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे सादर करा, शासनाकडून हे प्रस्ताव मंजूर करून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडवू, असा शब्द ना. शिवेंद्रराजे यांनी बैठकीत दिला. बैठकीत ठोसेघर निसर्ग पर्यटन विकास आराखडा, कुसुंबी पर्यटन विकास आराखडा यासह कास धरण, भांबवली धबधबा येथे पर्यटनवाढीसाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षितता व सोयीसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांचा आढावा ना. शिवेंद्रराजे यांनी घेतला. ही कामे लवकर मार्गी लागण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.