सातारा

सातारा : दारूबंदीच्या जावलीत चक्क दारूसाठी ठराव

दिनेश चोरगे

मेढा; पुढारी वृत्तसेवा : दारूबंदीसाठी व उभी बाटली आडवी करण्यासाठी यापूर्वी आंदोलने, ग्रामसभा, संघर्ष झाल्याच्या कितीतरी घटना आजपर्यंत घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारूबंदीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्यानंतर कुठे जावली तालुका दारूमुक्त झाला. आता मात्र उलटेच घडत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळ येथे व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक नेत्यांची बैठक होऊन तालुक्यातील दारूबंदी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. बैठकीतील या अजब मागणीची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

दारूमुळे जावली तालुक्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अपघात झाले. हे टाळण्यासाठी आणि पुढची पिढी व्यसनमुक्त होण्यासाठी जावलीतील विविध व्यक्ती आणि संघटनांनी दारूविरोधात एल्गार पुकारला. त्यानंतर अनेकदा संघर्षही करावा लागला. सरतेशेवटी तालुक्यातून दारू हद्दपार झाली. मात्र, आता तालुक्यात उलटाच मतप्रवाह पुढे येऊ लागला आहे.दारुबंदीच्या जावलीत दारुबंदी हटावचा नारा दिला जावू लागला आहे.

दारुबंदी हटवण्याच्या मागणीसाठी आज कुडाळ येथे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या पुढाकाराने बैठक झाली. दारूबंदीमुळे जावली तालुक्याच्या बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल कमी झाली आहे. प्रशासन व ग्रामपंचायती यांना विश्वासात घेऊन दारूबंदी हटवण्यात येऊ शकते का? यावर कुडाळ येथील बैठकीत विचारमंथन करण्यात आले. प्रसंगी महिलांचे परिवर्तन करून दारूबंदी उठवून पुन्हा दारूधंदे चालू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दि. 15 ऑगस्टच्या बैठकीत तसा ठराव घेण्याचा ग्रामस्थांचा मनोदय असल्याचे मत काहींनी मांडले.

दारूबंदी मागे घेण्याचे कारण देताना काही लोकांनी सांगितलं की, जावलीत गेली 16 वर्षांपासून दारूबंदी होती. त्यावेळी या लढ्यात बर्‍याच चेहर्‍यांनी आपलं योगदान दिलं होतं. मात्र, त्यानंतर तालुक्यात अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे हा प्रकार रोखायचा असेल तर दारूबंदी हटवावी लागेल, असेही मत काहींनी मांडले. अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने फक्त या तालुक्यात दारूबंदी असून उपयोग नाही, संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदी केली गेली तर त्याचा परिणाम झाला असता लगतच्या तालुक्यांमध्ये दारू विक्री सुरू असल्याने जावलीतील दारूबंदीचा हेतू साध्यच होत नाही, असेही मत मांडण्यात आले. दारूबंदीमुळे बाजारपेठेवर होणारा परिणाम दिसू लागल्याने कुडाळ ग्रामस्थांनी आडवी बाटली उभी करण्यासाठी आग्रही भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, माजी उपसभापती रवी परामणे, संदीप परामणे, बाजार समिती माजी उपसभापती राजेंद्र शिंदे, सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे, माजी सरपंच विरेंद्र शिंदे व कुडाळ ग्रामस्थ उपस्थित होते.

दारूबंदी हटवण्याचे'अर्थकारण' चर्चेत…

जावली तालुका दारूमुक्त झाल्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात तालुक्याचा गवगवा झाला होता. आदर्श तालुका म्हणून जावलीचा उल्लेख केला जाऊ लागला. मात्र, हीच गोष्ट अनेक फुटकळांना खटकली असावी. त्यांचेच सगेसोबती चोरीछुपे इतर तालुक्यांतून दारू आणून जावलीला बदनाम करण्याचा उद्योग करत होते. सातत्याने अवैध दारू विक्री होत असल्याची आवई उठवली गेली आणि आता लगतच्या तालुक्यातून दारू येत असेल तर आपल्याच तालुक्यातील दारूबंदी हटवा, असा पवित्रा घेतला गेला की काय? अशीही चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. दारूबंदी हटवण्याची नेमकी गरज का वाटते? दारूतच सगळे अर्थकारण आहे का? निकोप आणि निर्व्यसनी पिढी निर्माण करायची नाही काय? समाज सुधारणेच्या मार्गातील अडथळे सक्षम करायचे आहेत काय? असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT