सातारा : महाराष्ट्रावर ओढवलेल्या पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर राजधानी सातार्यातील ऐतिहासिक शाही दसरा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनता जनार्दनानेही शक्य होईल तितकी मदत पूरबाधितांसाठी सहाय्य म्हणून करावी, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
मराठवाडा, सातारा जिल्ह्यातील पूर्व भागासह संपूर्ण देशात वरुणराजाने हाहाकार माजवला आहे. पूरबाधितांच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दि. 2 ऑक्टोबर रोजीचा सातारचा विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यावर्षीचा निधी पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा तसेच जनता जनार्दनानेही माणुसकीच्या भावनेतून शक्य असेल ती मदत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये करावी, असे आवाहन केले आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात आणि विशेषकरून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी जीवित आणि मोठया प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पशुधनाचेही नुकसान झाले आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सातारचा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा थाटामाटात धूमधडाक्यात, डामडौलात करणे हे पटणारे नाही.
पावसामुळे मराठवाड्यासह हाहाकार झालेल्या ठिकाणी मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाने एक भारतीय म्हणून पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी शक्य होईल तितकी आर्थिक किंवा वस्तू किंवा धान्य स्वरूपातील मदत, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असेही आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.