वाई : वाई तालुक्यात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेशन कार्ड वितरण प्रक्रियेत एजंटांकडून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे आरोप होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड मिळवून देण्याच्या नावाखाली काही मध्यस्थांकडून उघडपणे पैसे उकळले जात आहे. याकडे तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष देवून उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
वाई तहसिल कार्यालयात पिवळे व केशरी रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी काही एजंटांकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात आहे. रेशन कार्ड सुरू करून देतो, कार्ड विभक्त करून देतो किंवा नवीन पिवळे कार्ड मिळवून देतो अशा अमिषांद्वारे नागरिकांची लूट होत आहे. असे अनेक एजंट तहसिल कार्यालय परिसरात कार्यरत आहे.
शासकीय प्रक्रियेला बगल देत लवकर कार्ड मिळवून देतो, असे सांगून मनमानी पैसे मागितले जात आहे. कार्यालयात ओळखी आहेत तुमचे काम लवकर होईल, असे सांगितले जात असल्याने नागरिक या एजंटांना बळी पडत आहे. दुसरीकडे शासकीय प्रक्रिया अत्यंत धीम्या पध्दतीने केली जात असल्याने नागरिकही एजंटांकडे वळत आहे. मात्र, एकदा प्रकरण दिल्यानंतर ही प्रकरणेही लवकर मार्गी लागत नाही. त्यानंतर पैशांची मागणी वाढत आहे.
या संपूर्ण प्रकारामागे साखळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. याचा शोध महसूल विभागाने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. याचबरोबर शासकीय रेशन कार्ड काढणे व दुरूस्ती प्रक्रिया गतीमान करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडूनच डोळेझाक होत असल्याने एजंटांचे फावत आहे.
या प्रकारामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. दरम्यान, वाई तालुक्यात या प्रकाराबाबत नाराजी पसरली आहे. रेशनसारख्या अत्यावश्यक योजनेत पारदर्शकता राखून सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.