Satara ZP President Election Dispute
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीदरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडींवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.
चव्हाण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, शिवसेना व राष्ट्रवादी यांची निवडणूकपूर्व आघाडी आणि स्पष्ट बहुमत असतानाही भाजपकडून सत्ता बळकावण्याचा “किळसवाणा प्रकार” घडला असून, हा लोकशाहीवरील काळा डाग आहे. राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्र सत्ता असताना साताऱ्यात घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायक व निंदनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या घसरत्या पातळीवरही भाष्य केले. “यशवंतरावांच्या सातारा जिल्ह्यातच लोकशाहीची अशी हत्या होत असेल, तर राज्यातील राजकारण कोणत्या थराला गेले आहे, हे स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.
तसेच, सत्ता हेच सर्वस्व मानून महाराष्ट्राच्या यशवंत विचारांना संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दरम्यान, स्थानिक माध्यमांनी निर्भीडपणे दिलेल्या बातम्या व घटनांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केल्यामुळे सत्य समोर आल्याचे सांगत चव्हाण यांनी माध्यमांचे अभिनंदन केले.
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली असून, या घटनेचे पडसाद राज्य सरकारच्या स्थैर्यावर उमटू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे.