लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा म्हणजेच पंढरीची वारी आज (शनिवारी) लोणंदनगरीत दाखल होत असून वैष्णवांच्या या मेळ्याचे जिल्ह्यात थाटात स्वागत होणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाच मुक्कामांसाठी दुपारी दोनच्या सुमारास या सोहळ्याचे आगमन होत असून माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात आगमन करण्यापूर्वी निरा नदीच्या पात्रात पाडेगाव बाजूच्या तीरावर श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येणार आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. उदयनराजे भोसले, ना. महेश शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांत राजेंद्रकुमार जाधव, डीवायएसपी राहुल धस, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, नायब तहसीलदार केतन मोरे, सपोनि सुशील भोसले, योगेश चंदनशिवे, दत्तानाना ढमाळ, आनंदराव शेळके - पाटील , पुरुषोत्तम जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
माऊलींचा पालखी सोहळा निरा येथून दुपारी दीडच्या सुमारास प्रस्थान ठेवणार असून त्यानंतर निरा नदीवरील जुन्या पुलावरून पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. निरा नदीच्या पाडेगाव तीरावर माऊलींचा रथ थांबल्यावर माऊलींच्या पादुका निरा स्नान घालण्यासाठी नेण्यात येतील. निरा स्नान व भाविकांसाठी वीर धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने दत्त घाटावर पादुका नेण्यासाठी बॅरिकेड लावण्यात आले आहे. ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना स्नान घालणार आहे त्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त व कमांडो यांची नेमणूक करण्यात आली आहे. दत्त घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, सर्पमित्र यांना पाचारण करण्यात आले आहे.
माऊलींचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगावच्या हद्दीत जिल्ह्याच्या वतीने पदाधिकारी व अधिकारी स्वागत करणार आहेत. माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्ह्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून माऊलींच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पाडेगाव ते लोणंद हे सुमारे सात किलोमीटर अंतर पार करून माऊलींचा पालखी सोहळा साधारणतः पाचच्या सुमारास लोणंदनगरीत प्रवेश करेल. त्यानंतर माऊलींची पालखी बाजार तळावर नेण्यात येईल. या ठिकाणी समाज आरती झाल्यानंतर माऊली अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी लोणंदनगरीत विसावेल. माऊलींच्या स्वागतासाठी संपूर्ण लोणंदनगरी सज्ज झाली आहे.
माऊलींचा पालखी सोहळा लोणंदनगरीमध्ये अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी विसावणार आहे. या ठिकाणी वारकरी व भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पालखी मार्ग, पालखी तळ व नीरा नदीवरील दत्त घाटासह सर्व ठिकाणी जय्यत तयारी झाली आहे. माऊलींचा मुक्काम असणार्या लोणंदच्या पालखी तळावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.