पाचगणी : स्वच्छतेसाठी सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेने यंदा पुन्हा एकदा राज्यपातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रथम येत सन्मान मिळवला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पाचगणीने घवघवीत यश संपादन करत सलग दुसऱ्या टप्प्यातही राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. हा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
‘माझी वसुंधरा 5.0’ आवृत्त्यांमध्ये 15,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिकांच्या गटात पाचगणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सलग उत्कृष्ट कामगिरीमुळे पाचगणीने राज्यात पर्यावरणपूरक शहर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण, ऊर्जा बचत, हरित उपक्रम तसेच हवामान बदलाबाबत जनजागृती या निकषांवर नगरपालिकांचे मूल्यमापन करण्यात आले. या अभियानांतर्गत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जलसंधारण, वृक्षारोपण, ऊर्जा बचत, सौरऊर्जेचा वापर, हरित उपक्रम तसेच हवामान बदलाबाबत जनजागृती या अंबलबजावणी करण्यात आले. हा गौरव सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आणि ‘माझी वसुंधरा’ अभियान सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
हा मानाचा पुरस्कार मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीप बगाडे, नगरसेविका श्रीमती राजश्री सणस, नगरसेवक गणेश कासुरडे आणि सिटी को-ऑर्डिनेटर ओंकार ढोले यांनी स्वीकारला. दरम्यान, पाचगणीच्या नागरिकांचा सक्रिय सहभाग, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि प्रशासनाचे प्रभावी नियोजन यामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाचगणीची ही हरित कामगिरी इतर नगरपालिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून भविष्यातही पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने अधिक जोमाने उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.