सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. सातारा जिल्ह्यात यापूर्वी 64 गट व 128 गण होते. मात्र, आता 2011च्या जनगणनेनुसार गट व गणांची नव्याने फेररचना होणार आहे. सातार्याची हद्दवाढ झाल्यामुळे शहरालगतचे 2 गट कमी होणार आहेत.
तर फलटण, कोरेगाव व खटावमध्ये नव्याने प्रत्येकी 1 गट वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात 65 गट व 130 पंचायत समिती गण तयार होणार आहेत. नवीन गट व गणाकडे जिल्ह्यातील इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान, अंतिम प्रभाग रचना दि. 18 ऑगस्टपर्यंत होणार असून जिल्हाधिकारी मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.
जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल मार्च 2022 मध्ये संपला. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सूत्रे हाती घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग सक्रीय झाला आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील 3 वर्षापूर्वीच्या रचनेत वाढलेले गट व गण रद्द झाले आहेत. त्यामुळे सन 2017 च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेवून कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असून त्या संदर्भातील अधिसूचना ग्रामविकास विभागाने काढली आहे. ग्रामविकास विभागाच्या पत्रकानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या नव्याने होणार्या 65 गट व पंचायत समित्यांच्या 130 गणांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सातारा जिल्ह्यात सन 2017 मध्ये 64 गट व 128 गण होते. सातारा तालुक्यात 10 गट व 20 गण होते. मात्र तालुक्यातील शाहूपुरी, विलासपूर, गोडोली ग्रामीण, दरे, पिरवाडीचा काही भाग सातारा नगरपालिकेत आला आहे. त्यामुळे दोन गट कमी होणार आहेत. यामुळे नवीन रचनेनुसार 8 गट व 16 गण होणार आहेत. खटाव तालुक्यात पूर्वी 6 गट व 12 गण होते. मात्र यामध्येही वाढ होणार असून 7 गट व 14 गण नव्याने होणार आहेत. कोरेगाव तालुक्यात पूर्वी 5 गट व 10 गण होते. मात्र त्यामध्येही वाढ होवून 6 गट व 12 गण नव्याने होत आहेत. फलटण तालुक्यात पूर्वी 7 गट व 14 गण होते.
मात्र नवीन रचनेत 8 गट व 16 गण होणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात गट व गणाच्या नवीन रचनेत सातारा तालुक्यात 2 गट व 4 गण कमी झाले तर खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यात प्रत्येक 1 गट व 2 गण वाढले जाणार आहेत. त्यामुळे नवीन गट व गणांच्या रचनेकडे इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दि. 14 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. दि. 21 जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर जिल्हाधिकार्यांकडे हरकती व सूचना सादर करणे, दि. 28 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी प्राप्त हरकतींच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करणार आहेत. दि. 11 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणार आहेत. दि. 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्याकडे सादर करणार आहेत.