सातारा : सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, खा. शरद पवार व पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. जिल्हा परिषदेला ते आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करु. या निवडणुकीला सामोरे जाताना मतांची विभागणी होवू नये म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीतपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. ज्या ठिकाणी घड्याळ व तुतारीची ताकद आहे त्या ठिकाणी पूर्णक्षमतेने निवडणूक लढवली जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. सातारा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, खा. शरद पवार व पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. जिल्हा परिषदेला ते आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करू.
महायुतीतील घटकपक्ष असणारा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आपल्यासोबत झाली होती या प्रश्नावर बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत बैठक झाली होती. जेथे आवश्यकता आहे तेथे आघाडी करावयाची, असे ठरले आहे. उमेदवार उत्साहाने फॉर्म भरायला येतात. ते लढण्यासाठी उभे राहतात. सध्याच्या लोकशाहीच्या निवडणुकीत आपण लढत आहे हे त्यांच्यामध्ये समाधान आहे. निवडणुकीची प्रक्रिया पुर्णत: बदलली आहे. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी काही उमेदवार लढतात. येणारी लढत सरळ मार्गाने झाली तर चित्र मागील निवडणुकीप्रमाणेच राहील. निवडणुकीत आता वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे सुरु झाले आहेत. भाविष्याकाळात या निवडणुकीला सामोरे जाताना एकत्रीत येवून मताची कशी विभागणी होणार नाही यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सोडला तर सर्वत्र भाजपा स्वबळावर लढत आहे यावर बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सध्या महायुतीमध्ये विभाजन झाले आहे. भाजप स्वबळावर लढत आहे, परंतू बाकीचे पक्ष एकत्र येवून लढत आहेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मित्रपक्ष नावापुरते गरजेपुरते वापर करण्याची प्रथा भाजपाची आहे. आ. महेश शिंदे आपल्यावर वारंवार टिका करत आहेत यावर बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, राज्याचा अध्यक्ष झालो आहे. टिका ही होत असते. टिकेला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. आपली संस्कृती आहे काही गोष्टींकडे लक्ष द्यायचे तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे, सरळमार्गाने काम करत रहायचे. लोकांना सगळं समजत असतं.
पक्ष चिन्हाच्या सुनावणी संदर्भातील प्रश्नावार बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होईल. सुप्रीम कोर्ट कधी निर्णय देतेय त्याची आम्ही वाट पहात बसलो आहोत. योग्यवेळ वरचे ठरवत असतील तर त्याला विलंबच होईल. निवडणुकावेळी निर्णय झाले तर चित्र वेगळे दिसेल. चिन्ह ज्या त्या मूळ पक्षालाच मिळेल. एप्रिल महिन्यात विविध बदल पहायला मिळतील का? या प्रश्नावर बोलताना आ.शशिकांत शिंदे म्हणाले, सध्या सर्व पक्ष संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे.