सातारा : देशातील महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या वाढत्या अडचणींमुळे लोकांमध्ये प्रक्षोभ व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यात पंतप्रधान अपयशी ठरत असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. जनतेला भेडसावणाऱ्या महागाईचा प्रश्न अजेंड्यावर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी 27 मे रोजी तालुकास्तरावर तर 29 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा केली.
शिंदे म्हणाले, विधान परिषदेच्या 16 ते 17 जागेच्या संदर्भात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यामध्ये सध्याची परिस्थिती बघता यश येईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. तरीही महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोणत्या पक्षाने कुठली जागा लढवायची, याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे.
सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघासाठी माझ्यासह बाळासाहेब पाटील व अन्य नावांची चर्चा सुरू आहे. जि.प. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवेळी शिवसेना व राष्ट्रवादीला भाजपने फसवले आहे. आताच्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यांनी जर तशाप्रकारचा प्रतिसाद दिला तर राज्यात त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यावयाचा ते घेऊ शकतात. त्यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू आहेत.
मात्र, त्यांच्या जागेमध्ये एकमत होतेय का? त्यांना अपेक्षित असलेल्या जागा मिळतात का? ते बघायचे आहे. अपेक्षित असलेल्या जागा मिळत नसेल तर भाजप त्यांना दाबतंय असे चित्र दिसेल. मात्र, न्याय मागायला त्यांना दिल्ली दरबारीच जावे लागत आहे. सातारा-सांगलीचा निकाल निश्चितपणाने वेगळा लागू शकतो, अशी त्यांची मानसिकता असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करू, असेही शिंदे म्हणाले. यावेळी राजकुमार पाटील, सुवर्णा पाटील, प्रवीण धस्के यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.