मारूल हवेली : निसरे (ता. पाटण) येथील कोयना नदीत आंघोळीसाठी गेलेल्या नारळवाडी येथील समर्थ दीपक चव्हाण (वय १२) या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ हा वडिलांसमवेत कोयना नदीत आंघोळीसाठी गेला होता. सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास निसरे बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या पानवठ्याजवळ तो आंघोळ करत होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. हे लक्षात येताच काही मुलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने नदीकिनारी आणले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
काही नागरिकांनी समर्थला तातडीने दवाखान्यात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. समर्थ हा आरेवाडी येथील वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. अल्पवयातच त्याचे निधन झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.