सातारा : पुढारी वृत्तसेवा
प्रसारमाध्यमे ही समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे माध्यमांनी कोणत्याही घटनेचे वृत्तांकन करताना जबाबदारीने व वस्तुनिष्ठपणे करावे. संवेदनशील घटनांच्या प्रक्षेपणावर खासगी दूरचित्रवाणी वाहिनी सनियंत्रण समितीचे बारकाईने लक्ष राहणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.
खासगी दूरचित्रवाणी वाहिनी संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, अॅड. मनिषा बर्गे, तुषार तपासे, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सविता साबळे, गणेश लोखंडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, खासगी दूरचित्रवाहिनी संनियंत्रण समितीची नियमितपणे बैठक घ्यावी. सामाजिक सलोखा बिघडवणार्या, जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणार्या आणि शहानिशा न करता बातम्यांचे प्रसारण करणार्या प्रक्षेपणावर ही समिती काटेकोरपणे लक्ष देणार आहे. अन्याय, अत्याचारग्रस्त, पीडित महिला व बालकांच्या संदर्भात घडणार्या गुन्ह्यांमध्ये त्यांची ओळख उघड होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जितेंद्र डूडी यांनी केल्या.
जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणाले, संवेदनशील व कायदा सुव्यवस्थेच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असणार्या बातम्या प्रसारित करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणी करण्याची दक्षता संबंधित माध्यमे व त्यांच्या प्रतिनिधींनी घ्यावी, अशी सूचना केली. यावेळी या बैठकीत समितीसमोर आलेल्या अर्जांवर सखोल चर्चा करण्यात आली.